Thursday, December 22, 2011

फेस–बुक –चीड–चीड

नेमकं हातात पेन घेऊन लिहायला बसलं की उडाले विचार आणि पुन्हा त्याचं विचारांचा पाठलाग करायचा म्हणजे अंधारात पत्ते शोधण्यासारखं आहे. काडी एकदा जशी पेटते ना तशी ती पुन्हा कधीच पेटत नाही, नंतर दुसरीच काडी पेटते विचारांचं तसच आहे तर विचारांना सुरुवात फेसबुक वर 'कुलकर्णी' ग्रूप वर (कदाचित उपयुक्त) टीका ह्यातून झाली. तर, हि कम्युनिटी कशाला सुरु केलीये देवजाणे ! पण अगदी निर्हेतुक वाटते, नव्हे आहेच. उगाच चार ठिकाणचे तेच ते विनोद/ लेख उत्स्फूर्त पणे 'पेस्ट' करण्यात काय तथ्य आहे ? कोणता उदात्त हेतू साध्य होतोय अशानी?

फेसबुक हे एक आधुनिक तंत्र-ज्ञान असले तरी त्याची उपयुक्तता हे दुय्यम दर्जाच्या वेब रंजनासाठीच होताना दिसतेय. आपण खरंच काहीतरी दर्जेदार पद्धतीने अशा ग्रुप्स चा उपयोग करावा हे कोणाच्या गावातही नाही वाटतं. बरं म्हणावं तर लोक एवढं मोकळं हि लिहित नाहीत. विज्ञान, साहित्य, कला यावर भाष्य करणे किंवा अजूनही कुठला चांगला उपयोग करणे..कुठाय सगळं ? का नाही करू शकत ? कॉम्पुटर ऑपरेट करू शकणारे लोक इतके मागास असू शकतात ? निदान एखाद्या गोष्टीवर प्रामाणिक पणे मतं तरी नोंदवतात का कोणी ? उगाच चार चौघांच्या 'प्रोफाईल' वर टिचक्या मारत बसायचं. आधी लोक गावभर उन्डरणे याला टुकार-पणा, आवारागर्दी म्हणायचे आता एका जागी बसूनही हे शक्य करून दिलंय फेसबुकनी या २१ व्या शतकात. फेसबुक वरच प्रत्येक पेज हे जनसामान्यांसाठी एक प्रकारे 'पेज ३' होऊन बसलंय. हे असले विचार उद्विग्न करतात मनाला आणि तिसऱ्या सेकंदाला हा ग्रूप अनजॉईन करावा आणि विंडो बंद करून टाकावी असं उत्कटतेने वाटते.

अर्थ शोधायचा नाहीये का कोणाला ? किंवा नसेल तर निर्माण करायचा ? शुद्ध मंदपणा नाहीये का हा ? सकारात्मक म्हणालं तर फेसबुक मुळे लोकं जरा जवळ आली आणि लोक जवळ आले की वेग वेगळ्या प्रचंड शक्यता निर्माण होऊ शकतात.. बरं आता जरा जवळ आलोत पण पुढे काय ?? काहीच होताना दिसत नाहीये..राज्य क्रांत्यांशिवाय !

(दिनांक-२७/४/११)

Sunday, December 18, 2011

लिहिणं आणि बोलणं

माणूस निश्चतपणे आधी बोलायला शिकला आणि नंतर लिहायला. लिहिणं हि याचाच अर्थ उन्नत अवस्था आहे. संशोधनाच्या दृष्टीकोनातून..म्हणजे अधिक उन्नत होण्याच्या गरजेतून .. ह्या दोन्ही मुलभूत क्षमतांच अतिसंक्षिप्त मूल्य मापन इथं करण्याचा प्रयत्न. लिहिताना जे लिहायचं आहे त्याबद्दल मेंदूला विचार करायला अधिक वेळ मिळतो, कारण लिहिताना आपण विचार करू शकतो. "बोलताना" तसंच नसतं, बोलणारा बोलूच शकतो, बोलताना सोबत विचारहि करणं म्हणजे (महा) कठीण ..आणि लिहिण्यापेक्षा बोलणं लवकर संपतं त्यामुळे केला विचार बोलताना तर त्यासाठीही वेळ मिळतो तो कमीच. शिवाय, बोलताना समोर कोणीतरी असावं लागतं 'नुसतं बोलतो' हे काही समाजात बुद्धीवादाचे प्रतीक मानले जात नाही, की वाह दररोज ४-६ तास एकटाच बोल-साधनेत मग्न असतात वगैरे..लिहिताना कसं, एकट्यानेच बसू शकतो (नव्हे लागतं) तासन तास ..दिवसेंदिवस आणि समोर कोणी असावं लागतं नाही.. (नकोच कोणी खरं तर) ..असं लिहित बसण्याला 'लेखन साधना' वगैरे गोंडस, प्रतिष्ठित नावं हि प्राप्त होतात.. कोणासमोर बोलायचं म्हणजे फार काळजी घ्यावी लागते, इच्छा नसली तरी. समोरच्याला जरा शिव्याशाप द्यायची सोय नाही, नाही तर तो कायमचा पळालाच समजा. त्याच्या/तिच्या बाजूने घ्याव लागतं यात आपली मूळ भावव्यक्तता बदलू शकते, अर्थात हे व्यक्तीवर अवलंबून आहे पण भावना 'modulate' होते, 'sophisticate' होते एवढं तर मी म्हणूच शकतो..कितपत होते हा भाग वेगळा..

Image Source:  http://lauraberry.wordpress.com/   
लिहिताना किंवा वाचताना जेव्हढे बारकावे लक्षात येतात तेव्हढे बोलताना आणि ऐकताना लक्षात येतात का ?..बोललेलं विरून जातं हवेत..बोलणाऱ्याला सुद्धा ते आठवणार नाही एखाद्यावेळेस की आपण काय बोललो ते..लिहिलेलं कागदावर टिकून राहतं...शिवाय प्रत्येक वेळेस वाचल्यावर वेगळं नव्याने काहीतरी समजत असतं. ऐकणं बहुतेकवेळा एकदाच होतं ! लिहिणं आणि वाचणं हे बोलणं आणि ऐकण्यापेक्षा निर्विवादपणे जास्त उपयुक्त आहे संशोधनासाठी..लिहिणं वाचणं हे एकट्याने साध्य आहे..त्यामुळे ते स्वतःच जास्त पूर्ण हि आहे !

लिहिलेलं वाचन करणारा म्हणजे म्हणजे वाचणे हि वाचणाऱ्याचीच खाज असते अखेर, लिहिणारा हे जाणून लिहू शकतो, त्यात वाचकाला शिव्या जरी हाणल्या असतील तरी तेव्हा लिहिणारा मात्र तेव्हा समोर नसतो.. ह्या शिव्या खाणं हा खरंतर वाचणाऱ्याचाच choice असतो . ऐकणं हे तेव्हढ सक्तीचं नाही..ऐकणारा काही गोष्टी लागलीच फेटाळून लावू शकतो… वाचताना त्या वाचाव्याच लागतात आणि काही काळ तरी त्या तशाच राहतात.या शिव्या शापाखेरीज..वाचन म्हणजे समोरच्याचे विचार त्याच्याच शब्दातून पाहणं .. त्याला लिहिताना मनात जे आहे ते जास्त तसच्या तसं ..modulate fodulate न होता उतरवता येतं..व्यक्तशुद्धतेचे महत्वाचे,अधिक गुण लिहिण्याला बोलण्यापेक्षा. लिहिणं हे बोलण्यापेक्षा जरा अधिक बिनधास्तच! एका संस्कृत सुभाषिताप्रमाणे आपले मुख म्हणजे अज्ञानाचे द्वार आहे आणि गांधी म्हणून गेलेत की मौनात प्रचंड सामर्थ्य आहे..तेव्हा निष्कर्ष म्हणुन आपण असं म्हणू या क की अधिक उन्नत व्हायचं असेल मानवाला तर त्यांनी त्याचं तोंड जरा बंद ठेवलेलाच बरं ?